"Where adventure is never scripted"

रोमांचक-हरिहर गड imageरोमांचक-हरिहर गड imageरोमांचक-हरिहर गड image
रोमांचक , साहसी सुबक पाय-यांनी सजलेला हरिहर गडाची भटकंती .......

किल्ले रामशेज वरून भटकंती करून आल्यावर लगेच आम्ही दुसर्या दिवशी पुढील भटकंती ची योजना आखली.. आणि ती होती आपल्या सुबक पायर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या किल्ले हरिहर ची. १९ जानेवारी २०१९ ला सकाळी आम्ही ५ वाजेला आम्ही नाशिक वरून त्र्यंबकेश्वर च्या दिशेने निघालो. तिथून १० किलोमीटर वर हरिहर गड आहे, अंतर जास्त नसल्याने ४५ मिनिटात आम्ही पोहचलो पण वाटेत अंधारात अचानक रस्त्याने सायकलने जाणाऱ्या माणसाला कारचा धक्का आम्ही थोडक्यात वाचवला. थोडक्यात होत्याचे न्हवते झाले असते ह्या विचाराने अंगावर शहरे आले.

हरिहर किल्ला : नाशिक जिल्ह्यातील सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे , त्याचा कातळ कोरीव पाय-यांचा मार्ग, त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारं सारं गिरिप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे १८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात”. खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे..

हरिहर गडावर पहिल्यांदाच जात असल्याने आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचल्यावर तिथून वाट दाखवण्यासाठी एका वाटाड्याला सोबत घेतले. घोटी-मोखाड्याकडे जाणार्या रस्त्याने आम्ही रस्त्यावरच्या निरगुडपाडा या गावात पोचलो , तिथेच झाडाखाली गाडी लायून नि वाटाड्याला सोबत घेत उत्तरेकडे निघालो. गाव सोडलं आणि थोडे पुढे आलो. लगेच उजवीकडे समोर पाहिल्यावर लगेच हरिहर किल्याचं गगनभेदी आकर्षक रुप आमच्या नजरेला खिळवून ठेवतं होते. सकाळची थंडी आजही जाणवत होतीच पण पाऊले आतुर होऊन गडाच्या दिशेने झपझप पडत होती.अर्ध्या तासाच्या सरळ चालीनंतर किल्याच्या पश्चिम डोंगरधारेवर दक्षिण बाजूने पोचलो तिथून घळीसारखा मार्ग व सोबतीला तुरळक झाडांच्या सोबतीने आम्ही वर चढाई करायला सुरवात केली. तासाभराच्या सोप्या चढाईनंतर आम्ही सपाटीवर आलो आणि थोड्याच वेळात वेताळ मंदिराजवळ पोहचलो.येताना जिथे हि छान निसर्ग आणि ठिकाण लागायचे ते लगेच आम्ही सोबत आणलेल्या मोबाईल आणि कॅमेरामध्ये कैद करून घायचो. वेताळ मंदिराजवळ उत्तर बाजूने दुसर्या बाजूचे पायथ्याचे गाव हर्षवाडीकडून येणारी वाटही इथेचं येऊन मिळते. पुढे उंचवट्या सारख्या मातीच्या टेकडीला पार केल्यावर आम्ही थेट हरिहरच्या सुबक पायरी मार्गाच्या अंगाला भिडलो. या कातळपायऱ्याच हरिहरचं खास वैशिष्ट्य आहेत. कितीतरी वेळ सारखं बघतचं रहावं असा वास्तूकलेचा अप्रतिम आविष्कार समोर उभा ठाकलेला असतो. माथ्यावर दोन बुरुजांच्या कवेत उभं ठाकलेलं सुंदर प्रवेशद्वार व त्यावर मोठ्या गर्वाने फडफडणारा भगवा इतिहास वैभवात घेऊन जातो .दगडात सरळ उभ्या कोरलेल्या पायऱ्या बघून तोंडातून आपसूक शब्द निघाला " अप्रतिम "

पायर्यांजवळ आल्यावर उभा वर चढताना मनात धडकी भरत होती. सुदैवाने पायऱ्यावर पकडण्यासाठी खाचे असल्याने थोडी भीती कमी झाली. आम्ही सावध पवित्रा घेत चढाईला सुरवात केली साधारण ऐंशी अंशाच्या कोनामध्ये सरळ रेषेत अगदी आभाळातच घुसलेली ही वाट आपण चढायला सुरुवात करतो, तेव्हा मात्र तिचा खरा अंदाज येतो. एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा पद्धतीची ही रचना केलेली दिसते .२० मिनिटात पायऱ्या चढून आम्ही सुरेख प्रवेशद्वारातून एका टप्प्यावर आलो. प्रवेशदारातून आलेली वाट पाहिली तर असं लक्षात येतं की वर येणं एकवेळ सोपं मात्र उतरणं महाकठीण! समोर उजवीकडे कातळात कोरलेली गणपतीची मूर्ती लक्ष वेधून घेते होती आणि प्रवेशद्वाराला लगतच तटाचं बांधकाम बघतचं रहावं असं होत. पुढे माथ्यावर जाण्याचा मार्ग अचंबित करणारा आहे. छोट्याश्या बोगद्यासारख्या भागातून थोडं वाकून गेल्यानंतर पुन्हा कातळपायऱ्या माथ्याकडे नेतात. हे पाहून त्या काळच्या वास्तूविशारदाचं कौतुक वाटत.या प्रवेशद्वाराच्या पुढेच गडाच्या पोटात खोदलेला रस्ता आहे. याच्याच पुढे वर जाण्यासाठी अप्रतिम असा दगडी बोगदा समोर येतो. खरोखर एकापेक्षा एक सरस सौंदर्याकृती आपल्या समोर पायघड्या टाकून पुढे येत राहतात.( चढत असतांना इथे रात्री थांबलेला ग्रुप मिळाला ज्यांचा रात्रीचा अनुभव त्यांनी आम्हाला सांगितला) त्यामुळे एकाचे कौतुक करायला लागलो की दुसरी रचना समोर! हे वास्तुस्थापत्याचे सौंदर्य तुषार झेलतच गडाच्या माथ्यावर आम्ही कधी आलो ते कळत देखील नाही.

माथ्यावर आल्यावर तिथे एक छोटासा तलाव लागतो आणि बाजूला पाण्याच्या टाक्या. तलावाच्या बाजूलाचं चौथऱ्यावर महादेवाची पिंड व नंदी आहेत. तलावातले पाणी खुपच स्वच्छ आणि पिण्यायोग्य होते. तिथेच आम्ही थोडा आराम करून सोबत आणलेल्या भत्ता , राजगिरा लाडू , लीम्बुपानी पियुन फ्रेश झालो. आमच्या समोरच मुंबई वरून २० ते २५ जणाचा ग्रुप लाकडे जमा करून खिचडी चा बेत करत होता.पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते.किल्ल्यावरील हीच सर्वात उंच जागा , या टेकडीवरुन एक अनोख थ्रिल अनुभवायला मिळाल. बाकी गडाच्या माथ्यावरून दिसणारं त्र्यंबकेश्वर डोंगररांगेचं अफाट चित्र डोळ्यांच पारणं फेडणार होतच.येथे आल्यावर आमची गडफेरी पूर्ण झाली. पायथ्यापासून निघून तीन तास झालेले होते इथून आम्ही परतीचं वाट पकडली. चढाई पेक्षा परतीची वाट भन्नाट थ्रिल आणि साहसिक अनुभव देत होती.असा हा खूप थ्रिल असलेला प्रवास आम्ही ५ तासात पूर्ण करून आम्ही नाशिकला निघालो.

काही काही किल्ल्यांची गोष्टच न्यारी असते. इतरांपेक्षा ते वेगळे का ठरतात याचे उत्तर कदाचित वाचण्यापेक्षा अनुभवण्यानेच जास्त विस्ताराने मिळते. नेहमीच्या सराव झालेल्या गडांच्या यादीतले थोडं वेगळं नाव आणि असंच आड वाटेवरचं स्थान म्हणजे हरिहर! तसं पाहिलं तर हरिहर गडाच्या भटकंतीचं सार येथल्या सुबक पाय-यांत सामावलेलं आहे. राकट अशा डोंगरात असणा-या या पाय-या म्हणजे कणखरतेला चढवलेला सौंदर्याचा साजच जणू..! या पाय-यांवरून चालताना तुमच्या-आमच्यासारखी दुर्गवेडी मंडळी स्वर्गाच्या वाटेशी तुलना करू लागली तर यात आश्चर्य आणि अतिशयोक्ती वाटायला नको.

-दिनेश पाटील 



I BUILT MY SITE FOR FREE USING