"Prepare for adventure"

महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई! imageमहाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई! imageमहाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई! image
पहिल्या ट्रेकिंग चा अनुभव ...सह्यद्री पर्वतराजीतल्या सर्वोच्च शिखरावर....

आमच्या ट्रेकिंग ग्रुप ची सुरवात सुरु झाली ती ह्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरील ट्रेकिंगने. ‘कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची टिंब टिंब मीटर आहे’, या वाक्यात अचूकपणे १६४६ लिहून शाळेत असताना परीक्षेत मार्क मिळवले होते, तेव्हा वाटलेही नव्हते की एक दिवस ह्य़ा शिखरावर जाऊ. ऑफिसला शनिवार-रविवार सुट्टी होती. नाशिकवरून शनिवारी ८ डिसेंबरला सकाळी ४:३० वाजेला कळसुबाईला जाण्‍याचे नक्की केले. २५ जणाचा ग्रुप आम्ही ४ कार मध्ये विभाजित केला. ६ वाजेला आम्ही कळसुबाई च्या पायथ्याशी असलेल्या बारी गावात पोहोचलो. गावातच एका घरात मस्त नाश्त्याची सोय आधीच करून ठेवली होती. चुलीवर बनवलेले मस्त गरमा गरम पोहे आणि चहा घेयून सकाळी ६:३० ला बारी गावातून कळसुबाई कडे जायला निघालो.

कळसूबाई शिखर : कळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे. सह्याद्रीच्‍या रांगेत पाच हजार फूटांच्या वर तीनच शिखरे आहेत. त्‍यांपैकी ‘घनचक्कर’च्‍या मुडा शिखराचा (१५३२ मीटर) तिसरा क्रमांक लागतो. दुस-या क्रमांकावर‘साल्हेर’वर असलेले ‘परशुराम मंदिरा’चे शिखर (१५६७ मीटर) आहे, तर पहिल्या क्रमांकावर 'कळसुबाई शिखर'! हा ट्रेक तीन ते चार तासांची तंगडतोड करून साधता येण्याजोगा आहे. शिखरापर्यंत पोचण्यासाठी ट्रेकिंग आणि पादचारी असे मार्ग आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता बारी गावापासून सुरू होतो. नाशिक - इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणेही पाहाता येतात.

इतिहास : कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय.

पायथ्याच्या बारी गावातून शिखराची उंची अंदाजे नऊशे मीटर आहे. त्यातील अर्ध्या उंचीपर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. आम्‍ही लगेच चालायला सुरुवात केली. मोबईलने शिखराचे वेगवेगळ्या ‘लूक’ने फोटो काढत बारी गाव पार केले, छोटासा ओढा ओलांडून आम्ही शेतांमधून वाट काढत चढाईला सुरुवात केली. बारी गावातून थोडे अंतर पुढे गेल्यावर वाटेत हनुमानाचे मंदिर लागते. त्‍या मंदिरापाठीमागील मार्गाने शिखरापर्यंत जाण्याचा मार्ग सुरू होतो. दक्षिणेकडून जाणारी गुरांची वाट, तसेच उत्तरेकडील इंदुरे गावातून शिखरावर जाण्यासाठी वाटा आहेत. चढाई करताना सुरुवातीलाच दगडी पायऱ्या लागतात. त्‍यांची उंची साधारण ढोपराएवढी आहे. पहिलीच वेळ आणि ट्रेकिंग चा अनुभव नसल्याने जोरात पायऱ्या चढायला सुरवात केली. तीस पायऱ्या पार करत करता अचानक श्वास भरून आला आणि चक्कर यायला लागले. थोडा वेळ वाटेत दगडावर बसून घेतले. थोडा वेळ आराम केल्यावर बर वाटले तेव्हा परत चढायला सुरवात करत शेतांमधून वाट काढत शंकराच्या मंदिराजवळ येऊन पोचलो. ४ जण आम्ही मागे होतो आणि बाकीचा ग्रुप पुढे निघून गेला होता. मंदिराच्या बाजूच्यावड-पिंपळाच्या झाडांवर पक्ष्यांचा चिवचिवाट अखंड सुरू होता. अशी सकाळ बऱ्याच दिवसांनी अनुभवत होतो! कुठलेही प्रदूषण नाही, आवाज नाही, त्यामुळे चालताना मजा येत होती. वातावरण प्रसन्न होते.

शिखरापर्यंत जाताना चढाईचा बराचसा भाग हा दगडा-दगडांतूनच वाट काढत जायचा होता, पण ज्या ठिकाणी चढ अतिशय तीव्र आहे, त्या ठिकाणी सोयीसाठी लोखंडी शिडय़ांची व्यवस्था पूर्वीच करण्यात आली आहे. दगडांमधून वाट काढत हाश्श-हुश्श करत चढाई सुरू केली. मधेच मागे वळून बघितले तर धुक्याबरोबर लपाछपी करत असलेले बारी गाव दिसले. त्याचे फोटो काढत ( सोबत स्वतःचेही ) पहिली शिडी पार केली. दुसर्या शिडीपर्यंत येत येत दम लागायला लागला मानून थोडा वेळ थांबलो. अशा उंच ठिकाणीही एका झोपडीवजा जागी एक काका आणि आजी लिंबू सरबत विकताना दिसले. त्याच्याकडून लिंबू शरबत घेयून काकां आजींशी छान गप्पाही झाल्या. तेव्हा कळलं की वर्षभर तिथे अनेक ट्रेकर्स येत असतातच, शिवाय तेव्हा स्थानिक वस्तू, पूजासाहित्य वगरे विकणारेही मोठय़ा संख्येने असतात.

तीन शिड्या आणि अनेक अवघड वळणे पार केल्यावर ११ वाजेला आम्हाला शिखराचे दर्शन झाले. गंमत म्हणजे पदभ्रमण करणाऱ्याने बारी गाव सोडल्यावर शिखराचे दर्शन होत नाही व त्यामुळे अजून किती चालायचे असा प्रश्न त्याला पडत राहतो. शेवटच्या टप्प्यात मात्र माथा दिसतो. माथा दिसल्याने आमचा चालण्याचा वेग वाढला आणि आम्ही अचानक थबकलो. कारण चक्क खमंग भज्यांचा वास येत होता! आणि पाण्याची विहीर दिसत होती ( सोबत आणलेले पाणी केव्हांच संपले होते ). विहिरीच्या समोर छप्पर असलेल्या एका आडोशामध्ये एक आजोबा भजी तळत होते. बाकी ग्रुप वर आधीच पोचलेला होता उरलेल्या आम्ही चौघांनी तिथेच बसकण मारली आणि चांगली दोन प्लेट गरमागरम भजी खाल्ली आणि समोरील विहिरीतील पाणी प्यायलो, फ्रेश झालो ( बिसलरी आणि फ्रीजमधील पाण्यापेक्षा हि स्वच्छ आणि थंड पाणी होत ) आणि भराभर शिखराच्या दिशेने पावले टाकत गेलो. कारण आमचा पुढे गेलला ग्रुप परतीच्या मार्गावर होता आणि आम्हीच लेट झालो होतो. अखेरची शिडी उंच आणि तीव्र चढण असलेली लोखंडी शिडी होती.ती पार केल्यावर काही वेळातच आम्ही कळसूबाई शिखरावर पोचलो, तेव्हा घडय़ाळातले काटे आणि आम्ही पण साधारण ‘वाजले की बारा’ असे होते.

शिखरावरती पोचल्यावर सगळ्यात आधी दिसले ते कळसूबाई देवीचे छानसे मंदिर आणि एक भगवा झेंडा. सगळ्यात आधी देवीला हात जोडून नमस्कार केला. शिखरावर माकड खूप मोठ्या संख्येने होते. त्याच्या करामती हि मजेशीर होत्या. शिखरावरून आजूबाजूचे सौदर्य व भंडारदऱ्याचा विस्‍तीर्ण जलाशय लक्ष वेधून घेत होता. मोबाइल सोबत असल्याने फोटो काढत निसर्गाला (आणि आम्हालाही) त्यात कैद करत होतोच. अर्थात जादूगार निसर्गाचे ते अप्रतिम सौंदर्य पाहून बहुतेकदा ते मनातच साठवून घ्यावेसे वाटत होते हेही खरेच! फोटो सेसेन झाल्यावर माथ्यावर चारी बाजूंनी फेरफटका मारण्यास सुरुवात केली. प्रवेशाची बाजू सोडता सर्व बाजूंनी रेलिंग टाकण्यात आले आहेत. ते काम एवढ्या उंचावर करणाऱ्यांना मनातून सलाम ठोकला. उन खूप वाढत होते पण शिखरावर सावलीलाही झाड नव्हते. थोडा वेळ आराम केला, मग चला आता निघुया म्हणत शिखरावरील भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांचे अनुभव मनात ठेवत, परिसराची दृश्ये डोळ्यांत साठवत उतरण्यास सुरुवात केली. उतरताना मात्र पटपट २:१५ मिनटात आम्ही पायथ्याशी आलोही. शिखर गाठण्यासाठी कितीही वेळ लागला, तरी एकदा उतरण सुरू झाली की माणूस ‘डाउन टू अर्थ’ यायला वेळ लागत नाही हे तेव्हा अनुभवले ....खरंच निसर्गासारखा गुरू नाही!

३ वाजेला पायथ्याशी पोचल्यावर बारी गावात एका घराच्या मोकळ्या जागेत पुढे गेलेला आमचा ग्रुप जेवण करून मस्त आराम करत आमची वाट पाहत होता. १७ किलोमिटर च्या पहिल्या ट्रेकिंग नंतर भूकही खूप लागली होती म्हणुन आम्ही हि पटकन गावातच चुलीवर बनवलेल्या जेवणावर ताव मारला आणि नाशिक च्या दिशेने निघालो. " Back to Home "

- दिनेश पाटील


I BUILT MY SITE FOR FREE USING