“Where the heart loves, there the legs walk.”

भटकंती ......"सांदण व्हॅली - एक अविस्मरणीय अनुभव"      image
अनुभव ....आशिया खंडातील दुसऱ्या नंबरच्या  दरीतील भटकंतीचा .....

नुकताच मे महिना सुरु झाला आणि सूर्यदेवता जरा जास्तच कृपादृष्टी दाखवत होता.अशा ऊन्हात ट्रेक तर सोड़ाच घराबाहेर पडायची देखील हिम्मत होत नव्हती . पण खरे ट्रेकर्स अशावेळीही सह्यादीचे राकट रूप बघायला बाहेर पडतात. मे च्या १ तारखेलाच टी एल पी ग्रुप च्या व्हाटअप ग्रुप वर आमच्या एका मेंबर ने इथे जाण्याचा बेत करायचा का म्हणून पोस्ट टाकली."सांदण व्हॅली" हे नाव मला पहिल्यांदा टी एल पी ग्रुप च्या व्हाटअप ग्रुप वर कळले तेव्हा लगेच नेहमीसारखेच गूगल चा आधार घेउन माहिती मिळवायला लागलो, जशी जशी माहिती वाचत होतो तसे तसे कुतुहूल वाढत होते आणि थोडं वाईटही वाटत होते कारण निसर्गाच्या कुशीत दडलेलं ‘सांधण दरी’ हे आश्चर्य मला माहीतही नव्हते. ११ आणि १२ मे ला आम्ही तिथे जाण्याचा आणि रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशी परत येण्याचा असा २ दिवसांचा प्लॅन बनवायला सुरवात केली पण काही जणांना जमत नसल्याने आम्ही १८ मे २०१९ ला एका दिवसाचा प्लॅन केला. आता पर्यंत आम्ही फक्त पर्वत किंवा किल्ले यांच्यावर ट्रेक केलेले होते  दरीत ट्रेकिंग करायची पहिलीच वेळ होती म्हणून खूप उत्सुकता होती . सकाळी ४.४५ ला आमची १० जणांची टीम कार ने नासिक-मुंबई महामार्ग वरून एका अनोख्या ट्रेक च्या दिशेने निघालो. अर्ध्या वाटेपर्यंत मित्राने परदेशातून आणलेल्या कॅमेराला सेल्फी स्टिकला ब्लु टूथ ने कसे कनेक्ट करायचे याचा प्रयन्त करण्यात गुंतलेलो होतो.

सांदण व्हॅली : सांदण व्हॅली ही निसर्गाने निर्माण केलेली एक सुंदर दरी आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या ह्या २०० ते ४०० फूट खोल दरीचा आशिया खंडामध्ये दुसरा क्रमांक लागतो. नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात भंडारदऱ्यापासून जवळच सामरद गावापासून ही व्हॅली सुरू होते. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा

६ वाजेला आम्ही भंडारदरा रस्त्याला लागलो आणि सह्याद्री पर्वत रांगेचे दर्शन झाले. पावसाळ्यात नेहमी हिरवेगार असणारे डोंगर उन्हाळ्यात खूपच राकट दिसत होते. ६.२० ला आम्ही रस्त्यावर लागलेल्या बारी गावाजवळ पोचलो . होय तेच बारी गाव जिथून कळसुबाई च्या ट्रेक ने आमच्या टी एल पी ग्रुप ची सुरवात झाली होती. थोड्याच वेळात आम्ही भंडारदरा धरणापाशी असलेल्या शेंडी गावात पोहोचलो तिथे आमच्या एका मित्राने आधीच गाईडची ( सखाराम )व्यवस्था केलेली होती. शेंडीतून सखाराम सोबत घेउन आम्ही त्याच्या जावईच्या घरी आलो तिथेच आमच्या नाश्त्याची सोय केलेली होती. तिथे मस्त सकाळी चुलीवर बनवलेल्या पोह्यावर आम्ही ताव मारला. महाराष्टात पाणी प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव हि तिथे ६० वर्षाच्या आजीला २ ते ३ किमी दुरून प्रवास करून पाणी भरताना बघून झाली. पेटपूजा आणि ग्रुप फोटो काढून आम्ही गाईडच्या मदतीने धरणाच्या पाणलोट क्षेत्राला वळसा घालून घनचक्कराच्या पदरातून रतनवाडीच्या मार्गाने साम्रदला पोहोचतो (अंदाजे २० किमी). हा रस्ता निर्विवादपणे देखणा होता . घनचक्कराच्या कडेने, तलावाच्या बाजूने कधी दाट झाडीतून तर कधी उघड्या आभाळाच्या साक्षीने हा रस्ता चढ उतार घेत वळणे वळणे घेत जातो. त्या रस्त्याने आम्ही साम्रद गावाला पोहोचलो.इथेतर सह्याद्री आपले राकट सौंदर्य दाखवत उभा होता. रतनगड, खुट्टा यांचे एका वेगळ्याच बाजूने अतीशय प्रेक्षणीय दर्शन होत होते. बाजूलाच आजोबाचा महाकाय पर्वत आपल्याला आजोबा का म्हणतात ते दाखवून देत होता. कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगड पाठीमागच्या बाजूने रौद्र दर्शन देत होते. साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे या गावापासून ही व्हॅली सुरू होते . तिथे गाडी लावून आम्ही सखाराम यांस सांदण दरीची वाट दाखवण्यास बरोबर घेतले. १०/१५ मिनिटातच कातळाच्यासड्यावरून आमची वाट दाट झाडीत शिरली. व थोड्याच वेळात आम्ही एका घळीच्या मुखाशी आलो. सांदण दरीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे. इथे आम्ही सुरवात करणार होतो रॅपलिंग ने.सांदण व्हॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे "रॅपलिंग". आम्हीसर्वचजण खूप उत्सुक होतो रॅपलिंगचा अनुभव घेण्यासाठी. आमच्यातले बरेच जण (मी सुद्धा) पहिल्यांदाच रॅपलिंग करणारे होते. तस काहींना थोडा-फार अनुभव होता पण ते पण थोडे घाबरत होतेच.

शेवटी आम्ही तिथे पोहचलो ज्याची सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होते. सांदण व्हॅलीतील "रॅपलिंग" चा. हा पॅच साधारण ४०-५० फुटाचा होता .सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेत, दोरी , हेल्मेट , Locking Carabiner आणि हॅन्ड ग्लोव्हस घालुनच आमच्यातलं प्रत्येकजण हळू हळू सुरक्षित खाली उतरत होते काही सहकारी रॅपलिंग करत असलेल्यांचे आयुष्यातील पहिल्या रॅपलिंग चे विडिओ आणि फोटो काढत होते . रॅपलिंग सुरु करताना भीती वाटत होती पण पूर्ण केल्यावर खूप भारी फीलिंग येत होती . आम्ही एक एक करून २ तासात रॅपलिंगचा थरारक अनुभव घेउन दरीच्या घळीमध्ये उतरलो. घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा लागला जो उन्हाळ्यातही आटलेला नव्हता. इतके स्वछ थंड आणि नितळ होते कि आतले मासे आणि दगडही मोजता येत होती. तो पाण्याचा जारा पार करून सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आम्ही आत दरीच्या नाळेत प्रवेश केला. आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५ ते २० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २ ते ३ फूट अशी ती अतिशय निरुंद नाळ होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती. पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला. साधारण ०.५ फूट खोल १२ ते १३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आणि लाकडाच्या साहाय्याने आम्ही कौशल्याने मार्ग काडून पलीकडे गेलो ( काहींचे जास्तच कौशल्य दाखवण्यात बूट ओले झालेत त्यात मीही होती ) . आता तीव्र उतार सुरु झाला होता. नाळ अधिकाधिक अरूंद होत होती. कुठेही सपाट मार्ग नव्हता. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षर्शः तिथे खच पडला होता. एका ठिकाणी कुणी तरी आपले डोळे ( गॉगल ) दगडावरच विसरून गेलेले होते त्याला हाथ न लावता आमचा नाळेतूनच प्रवास चालला होता. जवळ जवळ १.५ किमी अश्या ह्या अरूंद नाळेच्या टोकाशी पोहोचायला ३० ते ४० मिनिटे लागले . दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नव्हते . आता आम्ही नाळेच्या टोकाशी आलो होतो. आत इथून सह्यादीचे पर्वताचे उग्र दर्शन होते होते. ३५०० फूट सरळ तुटलेले कडे व रतनगडाचा कडा प्रेक्षणीय दिसत होता ( आम्हाला ट्रेकच व्यसन लावणाऱ्यावर सहकारी जास्त रिस्क घेत असताना त्यांची १८ वर्षाच्या मुलीने काळजीने वेळोवेळी " 'पप्पा नको " म्हणून घेतलेली काळजीही कौतुकास्पद होती). ही नाळ पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जावुन मिळते असे गाईड ने आम्हाला सांगितलं. १५ ते २० मिनिटे तिथे थांबून आम्ही तिथले सौंदर्य आणि आम्हाला कॅमेरामध्ये कैद करत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

दरीत जाताना सोपं होत पण येतांना दगड धोंडे चढत येत असल्याने भूकही खूप लागली होती. दरी संपल्यावर टोकावर बसलेल्या २ मुलांकडून आम्ही थोडासा पोटोबा मानून ताजी काकडी आणि करवंद ( डोंगराची काली मैना ) घेउन खात खात आम्ही कार च्या दिशेने निघालो. जेवणाच्या बेत सखारामच्या जावई कडे असल्याने आणि बनवायला वेळ असल्याने आम्ही कारने कोकणकडा कडे निघालो. कोकण कड्यावरून घाटघरचा रौद्र कोकणकडा व पायथ्याचा तलाव व त्यावरील विद्युत प्रकल्पाचे सुंदर दर्शन होत होते. तिथले दृश्य डोळ्यात साठवत आम्ही शेंडी गावात आलो तोपर्यंत जेवणाची सोय झालेलीच होती. मस्त चुलीवर बनवलेले गावरान कोंबडे, भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा ( ठेचा ची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय ) वर मनसोक्त ताव मारला आणि थोडा आराम करून गाईड ने केलेल्या सोयीबद्दल आभार मानून आणि दरीतल्या आठवणी घेऊन आम्ही आमच्या घरट्याकडे ( नाशिक ) परतीला निघालो.

मोठमोठ्या दगडांमधून वाट काढत आणि त्यावरून उड्या मारत पुढे जायचं...पहिली रॅपलिंग चा अनुभव .. सोबतीला उंच, उभाच्या उभा काळाकभिन्न कातळ...डोंगराच्या कुशीत उगम पावणाऱ्या धबधब्याच्या मार्गानं चालायला सुरुवात करून थेट नदीपर्यंत जाण्याचा सांदण व्हॅलीचा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे. .. पण हा ट्रेक आयुष्याच्या कोपरयात कुठेतरी कायमच घर करुन राहील हे मात्र नक्की ......

- दिनेश पाटील 





I BUILT MY SITE FOR FREE USING