आमची भटकंती

"Never measure the height of a mountain until you reach the top"

“The mountains are calling and we must go.”

  • Nashik, Maharashtra, India
 आमची ओळख  image आमची ओळख  image आमची ओळख  image
टी एल पी किल्ले ट्रेकर्स ग्रुप मध्ये आपले स्वागत आहे. ऑफिस मध्ये असताना चार डोकी एकत्र येऊन, डोंगर भटकंती सुरु केली आणि त्यातूनच अशीच आमच्या ट्रेकिंग ग्रुपची सुरवात झाली.

विश्व वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मित्रांनी मिळून ट्रेकिंग आणि गड किल्ले सर करण्यास सुरवात केली.
आम्ही साधारण डिसेंबर २०१८ पासून ट्रेकिंग करण्यास सुरवात केली आणि आम्ही ९- १० ट्रेक यशस्वी पणे केल्या.

ट्रेकिंग एक छंद म्हणून मानले जाऊ शकते आणि गड किल्ले सर करणे, ट्रेकिंग करणे जणू आमचा छंदच झाला आहे. आणि त्याबद्दल रुची आणि आवड दिवसेन दिवस वाढतच आहे. ट्रेकिंग हा एक साहसी छंद आहे ज्याला निसर्गाची सानिध्यात राहायला आवडते त्यांच्यासाठी ट्रेकिंग हि पर्वणीच आहे, त्यामुळे मानसिक आणि आरोग्य दोन्ही साठी फायदे होऊ शकतात. ट्रेकिंग तणावमुक्त म्हणून कार्य करते आणि त्यामुळे आपल्याला उदासीनतांवर मात करण्यास मदत होऊ शकते. ट्रेकिंग मुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती , हिम्मत आणि स्वतःवरचा विश्वास वाढतो.

आमचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रा मधील सर्व किल्ले सर करणे. महाराष्ट्र ट्रेकिंग साठी उत्तम असे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असे बरेच किल्ले बघण्यासारखे आणि ट्रेकिंग साठी खूप छान आहेत. आम्ही महाराष्ट्रातील विस्तीर्ण सह्याद्रीच्या उंच उंच पर्वत रांगा, घनदाट जंगल, नद्या व धबधबे, दगडी बांधकाम आणि किल्ले पाहण्यासाठी टी एल पी फोर्ट ट्रेकर्स ग्रुप ची सुरवात केली.

"Let's go on an adventure"

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागातील सर्वात कठिण अशा किल्ल्यांची ही भटकंती  ...

नाशिक वरून भंडारदऱ्याला जातांना कळसूबाई शिखराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे. किल्ल्यावर जाण्याच्या वाटा अवघड असल्यामुळे प्रस्तरारोहाणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.

अलंग गड : ४ मे २०१९ ला शनिवारी सकाळी आम्ही ५ वाजता नाशिक वरून तीन जणाचा ग्रुप सह्याद्री मधील कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये म्हणजे अलंग मदन आणि कुलंग गडाच्या ट्रेकिंग साठी निघालो. ७.३० ला आम्ही अलंग गडावर आंबेवाडी गावावरून सुरवात गेली. अलंग किल्ला Alang Fort – हा ४५०० फूट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत अवघड समजला जातो. कुठल्याही प्रकारच्या गाईड किवा रस्ता माहिती नसतांना आम्ही अलंग गडाच्या पायथ्यापासून चढायला सुरवात केली. घनदाट जंगल आणि निरव शांतता मनात धडकी भरवत होती. अर्धा डोंगर चढल्यावर रस्ते सापडत न्हवते म्हणून कोरड्या नदीच्या मार्गाने आम्ही वर चढायला सुरवात केली पण मधमाश्याचे पोळे त्या मार्गावर असल्याने आम्हाला मार्ग बदलून खडतरा मार्गाने प्रवास करावा लागला. सकाळ आणि ताजेताजाने असल्याने गडाच्या माथ्यावर आम्ही २ तासात पोचलो .उजवीकडचा पाहिल्यावर मदन किल्ला आमच्या स्वागतासाठी उभा होता.

मदन गड : मदनगड किल्ला Madangad Fort – ४९०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. किल्ला तसा बराच प्राचीन आहे. आणि तेवढाच दुर्गम सुद्धा. अलंग वरून पाण्याच्या घळई आणि जंगलातून आम्ही मदन गडाला सकाळी ९:४५ वाजेला सुरवात केली. गडाची वाट खूपच अवघड होती पण परिसर खूपच सुंदर आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. सूर्य हळू हळू तापत होता आणि उन्हात चालणेहि कठीण होत होते. २:१५ मिनिटात आम्ही गडावर पोचलो. ४ तास भर उन्हात चालून भूक खूप लागली होती . निसर्गाच्या सानिध्यात सोबत आणलेल्या पिठले, भाकरी, मिरची ठेचा आणि कांदा सोबत नाशिक चा फेमस कराड भत्ता वर आम्ही मनसोक्त ताव मारला. पेटपूजा आणि थोडा आराम केल्यावर पुढील लक्ष्य असलेल्या कुलंग गडाकडे आम्ही मार्गस्त झालो.

कुलंग गड : स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी मदन गडाच्या कातळकडाने चालायला सुरवात केली. मदन गड आणि कुलंग गड च्या जोडनाऱ्या पुलावर आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवत होता. एका ठिकाणी खूप खोल दरी होती आणि वाट इतकी बिकट होती कि पूर्ण ट्रेकिंग मध्ये पहिल्यांदा आम्ही ती कशी पार होईल हा विचार करून घाबरत होतो. हिमतीने आणि एकमेकांच्या मदतीने आम्ही ती पार केली आणि सुटकेच्या श्वास घेतला. समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई करायला सुरवात केली.गडावर येत येत सोबत आणलेले पाणी हि संपले. गडावर असलेया पाण्याच्या टाकीमधून आम्ही मनसोक्त पाणी पायलो अन सोबत असलेल्या बाटली मध्ये पुढील प्रवासासाठी पाणी घेतले.ओळीने असणारी पाण्याची टाकी पाहून आम्ही कुलंगच्या पुर्व कड्यावर या पाताळवेरी कड्यावर आलो . इथून कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. दुपारचे ४ वाजले होते आणि एवढे थकलो होतो कि पाय उचलेले जात नव्हते.

कुलंग गडावरून खाली उतरताना रस्त्यात आम्हाला करवंद ( डोंगराची काळी मैना ) चे झाडे लागलीत. गोड आणि ताजे करवंद खात खात आम्ही आंबेवाडी गावाकडे निघालो. ११ तासांचा आणि 20 किलोमीटर ट्रेकिंग ( अलंग मदन आणि कुलंग ) खरच खूप अवघड , शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकवणारी होती पण तितकीच आमच्यासाठी तो अनुभव खूपच महत्वाचा आणि अविस्मरणीय होता.

- दिनेश पाटील




किल्ले अलंग मदन आणि कुलंग imageकिल्ले अलंग मदन आणि कुलंग imageकिल्ले अलंग मदन आणि कुलंग image

"Prepare for adventure"

महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई! imageमहाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई! imageमहाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई! image
पहिल्या ट्रेकिंग चा अनुभव ...सह्यद्री पर्वतराजीतल्या सर्वोच्च शिखरावर....

आमच्या ट्रेकिंग ग्रुप ची सुरवात सुरु झाली ती ह्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरील ट्रेकिंगने. ‘कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची टिंब टिंब मीटर आहे’, या वाक्यात अचूकपणे १६४६ लिहून शाळेत असताना परीक्षेत मार्क मिळवले होते, तेव्हा वाटलेही नव्हते की एक दिवस ह्य़ा शिखरावर जाऊ. ऑफिसला शनिवार-रविवार सुट्टी होती. नाशिकवरून शनिवारी ८ डिसेंबरला सकाळी ४:३० वाजेला कळसुबाईला जाण्‍याचे नक्की केले. २५ जणाचा ग्रुप आम्ही ४ कार मध्ये विभाजित केला. ६ वाजेला आम्ही कळसुबाई च्या पायथ्याशी असलेल्या बारी गावात पोहोचलो. गावातच एका घरात मस्त नाश्त्याची सोय आधीच करून ठेवली होती. चुलीवर बनवलेले मस्त गरमा गरम पोहे आणि चहा घेयून सकाळी ६:३० ला बारी गावातून कळसुबाई कडे जायला निघालो.

कळसूबाई शिखर : कळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे. सह्याद्रीच्‍या रांगेत पाच हजार फूटांच्या वर तीनच शिखरे आहेत. त्‍यांपैकी ‘घनचक्कर’च्‍या मुडा शिखराचा (१५३२ मीटर) तिसरा क्रमांक लागतो. दुस-या क्रमांकावर‘साल्हेर’वर असलेले ‘परशुराम मंदिरा’चे शिखर (१५६७ मीटर) आहे, तर पहिल्या क्रमांकावर 'कळसुबाई शिखर'! हा ट्रेक तीन ते चार तासांची तंगडतोड करून साधता येण्याजोगा आहे. शिखरापर्यंत पोचण्यासाठी ट्रेकिंग आणि पादचारी असे मार्ग आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता बारी गावापासून सुरू होतो. नाशिक - इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणेही पाहाता येतात.

इतिहास : कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय.

पायथ्याच्या बारी गावातून शिखराची उंची अंदाजे नऊशे मीटर आहे. त्यातील अर्ध्या उंचीपर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. आम्‍ही लगेच चालायला सुरुवात केली. मोबईलने शिखराचे वेगवेगळ्या ‘लूक’ने फोटो काढत बारी गाव पार केले, छोटासा ओढा ओलांडून आम्ही शेतांमधून वाट काढत चढाईला सुरुवात केली. बारी गावातून थोडे अंतर पुढे गेल्यावर वाटेत हनुमानाचे मंदिर लागते. त्‍या मंदिरापाठीमागील मार्गाने शिखरापर्यंत जाण्याचा मार्ग सुरू होतो. दक्षिणेकडून जाणारी गुरांची वाट, तसेच उत्तरेकडील इंदुरे गावातून शिखरावर जाण्यासाठी वाटा आहेत. चढाई करताना सुरुवातीलाच दगडी पायऱ्या लागतात. त्‍यांची उंची साधारण ढोपराएवढी आहे. पहिलीच वेळ आणि ट्रेकिंग चा अनुभव नसल्याने जोरात पायऱ्या चढायला सुरवात केली. तीस पायऱ्या पार करत करता अचानक श्वास भरून आला आणि चक्कर यायला लागले. थोडा वेळ वाटेत दगडावर बसून घेतले. थोडा वेळ आराम केल्यावर बर वाटले तेव्हा परत चढायला सुरवात करत शेतांमधून वाट काढत शंकराच्या मंदिराजवळ येऊन पोचलो. ४ जण आम्ही मागे होतो आणि बाकीचा ग्रुप पुढे निघून गेला होता. मंदिराच्या बाजूच्यावड-पिंपळाच्या झाडांवर पक्ष्यांचा चिवचिवाट अखंड सुरू होता. अशी सकाळ बऱ्याच दिवसांनी अनुभवत होतो! कुठलेही प्रदूषण नाही, आवाज नाही, त्यामुळे चालताना मजा येत होती. वातावरण प्रसन्न होते.

शिखरापर्यंत जाताना चढाईचा बराचसा भाग हा दगडा-दगडांतूनच वाट काढत जायचा होता, पण ज्या ठिकाणी चढ अतिशय तीव्र आहे, त्या ठिकाणी सोयीसाठी लोखंडी शिडय़ांची व्यवस्था पूर्वीच करण्यात आली आहे. दगडांमधून वाट काढत हाश्श-हुश्श करत चढाई सुरू केली. मधेच मागे वळून बघितले तर धुक्याबरोबर लपाछपी करत असलेले बारी गाव दिसले. त्याचे फोटो काढत ( सोबत स्वतःचेही ) पहिली शिडी पार केली. दुसर्या शिडीपर्यंत येत येत दम लागायला लागला मानून थोडा वेळ थांबलो. अशा उंच ठिकाणीही एका झोपडीवजा जागी एक काका आणि आजी लिंबू सरबत विकताना दिसले. त्याच्याकडून लिंबू शरबत घेयून काकां आजींशी छान गप्पाही झाल्या. तेव्हा कळलं की वर्षभर तिथे अनेक ट्रेकर्स येत असतातच, शिवाय तेव्हा स्थानिक वस्तू, पूजासाहित्य वगरे विकणारेही मोठय़ा संख्येने असतात.

तीन शिड्या आणि अनेक अवघड वळणे पार केल्यावर ११ वाजेला आम्हाला शिखराचे दर्शन झाले. गंमत म्हणजे पदभ्रमण करणाऱ्याने बारी गाव सोडल्यावर शिखराचे दर्शन होत नाही व त्यामुळे अजून किती चालायचे असा प्रश्न त्याला पडत राहतो. शेवटच्या टप्प्यात मात्र माथा दिसतो. माथा दिसल्याने आमचा चालण्याचा वेग वाढला आणि आम्ही अचानक थबकलो. कारण चक्क खमंग भज्यांचा वास येत होता! आणि पाण्याची विहीर दिसत होती ( सोबत आणलेले पाणी केव्हांच संपले होते ). विहिरीच्या समोर छप्पर असलेल्या एका आडोशामध्ये एक आजोबा भजी तळत होते. बाकी ग्रुप वर आधीच पोचलेला होता उरलेल्या आम्ही चौघांनी तिथेच बसकण मारली आणि चांगली दोन प्लेट गरमागरम भजी खाल्ली आणि समोरील विहिरीतील पाणी प्यायलो, फ्रेश झालो ( बिसलरी आणि फ्रीजमधील पाण्यापेक्षा हि स्वच्छ आणि थंड पाणी होत ) आणि भराभर शिखराच्या दिशेने पावले टाकत गेलो. कारण आमचा पुढे गेलला ग्रुप परतीच्या मार्गावर होता आणि आम्हीच लेट झालो होतो. अखेरची शिडी उंच आणि तीव्र चढण असलेली लोखंडी शिडी होती.ती पार केल्यावर काही वेळातच आम्ही कळसूबाई शिखरावर पोचलो, तेव्हा घडय़ाळातले काटे आणि आम्ही पण साधारण ‘वाजले की बारा’ असे होते.

शिखरावरती पोचल्यावर सगळ्यात आधी दिसले ते कळसूबाई देवीचे छानसे मंदिर आणि एक भगवा झेंडा. सगळ्यात आधी देवीला हात जोडून नमस्कार केला. शिखरावर माकड खूप मोठ्या संख्येने होते. त्याच्या करामती हि मजेशीर होत्या. शिखरावरून आजूबाजूचे सौदर्य व भंडारदऱ्याचा विस्‍तीर्ण जलाशय लक्ष वेधून घेत होता. मोबाइल सोबत असल्याने फोटो काढत निसर्गाला (आणि आम्हालाही) त्यात कैद करत होतोच. अर्थात जादूगार निसर्गाचे ते अप्रतिम सौंदर्य पाहून बहुतेकदा ते मनातच साठवून घ्यावेसे वाटत होते हेही खरेच! फोटो सेसेन झाल्यावर माथ्यावर चारी बाजूंनी फेरफटका मारण्यास सुरुवात केली. प्रवेशाची बाजू सोडता सर्व बाजूंनी रेलिंग टाकण्यात आले आहेत. ते काम एवढ्या उंचावर करणाऱ्यांना मनातून सलाम ठोकला. उन खूप वाढत होते पण शिखरावर सावलीलाही झाड नव्हते. थोडा वेळ आराम केला, मग चला आता निघुया म्हणत शिखरावरील भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांचे अनुभव मनात ठेवत, परिसराची दृश्ये डोळ्यांत साठवत उतरण्यास सुरुवात केली. उतरताना मात्र पटपट २:१५ मिनटात आम्ही पायथ्याशी आलोही. शिखर गाठण्यासाठी कितीही वेळ लागला, तरी एकदा उतरण सुरू झाली की माणूस ‘डाउन टू अर्थ’ यायला वेळ लागत नाही हे तेव्हा अनुभवले ....खरंच निसर्गासारखा गुरू नाही!

३ वाजेला पायथ्याशी पोचल्यावर बारी गावात एका घराच्या मोकळ्या जागेत पुढे गेलेला आमचा ग्रुप जेवण करून मस्त आराम करत आमची वाट पाहत होता. १७ किलोमिटर च्या पहिल्या ट्रेकिंग नंतर भूकही खूप लागली होती म्हणुन आम्ही हि पटकन गावातच चुलीवर बनवलेल्या जेवणावर ताव मारला आणि नाशिक च्या दिशेने निघालो. " Back to Home "

- दिनेश पाटील


" It's Time For An Adventure "

 ब्रम्हगिरी आणि दुर्ग भांडार किल्ला ! image ब्रम्हगिरी आणि दुर्ग भांडार किल्ला ! image ब्रम्हगिरी आणि दुर्ग भांडार किल्ला ! image
दुसरी भटकंती..... ब्रम्हगिरी आणि  ब्रम्हगिरीचा दुर्लक्षित परंतु रोमांचक भाग दुर्ग भांडार किल्ला !

नाशिक मध्ये येऊन ८ वर्ष झालीत पण कधी ब्रम्हगिरी पर्वतावर जाण्याचा योग येत नव्हता. टी एल पी ट्रेकिंग ग्रुप च्या माध्यमातून आम्ही कळसुबाई सर करून आल्यावर २ आठवड्याने ब्रम्हगिरी आणि ब्रम्हगिरीचा दुर्लक्षित परंतु रोमांचक भाग दुर्ग भांडार किल्ला जाण्याचा बेत आखला. २२ डिसेंबर २०१८ ला आम्ही सकाळी ६ वाजेला नाशिक वरून त्र्यंबकेश्वर ला निघालो.

ब्रह्मगिरी : म्हणजेच त्र्यंबकगड. नाशिक हून जवळपास २५ किलोमीटर वर असलेले, त्र्यंबकेश्वर हे पायथ्याचे गाव. येथील महादेवाचे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे प्रसिद्ध असून मागच्याच ब्रह्मगिरी पर्वतावर गौतमी गंगा अथवा गोदावरी नदी चे पवित्र असे उगम स्थान आहे. अनेक ठिकाणी उगम पाऊन, पुन्हा लुप्त होत शेवटी ती नाशिक मधील पंचवटी हून पुढे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. सकाळी लवकरच ७ वाजेला आम्ही चढाईला सुरुवात केली. वातावरण थंड असल्याने गारवा जाणवत होता. सगळे त्र्यंबकेश्वर अजुन धुक्यातच आळोखे पिळोखे देत होते. झपझप पावले टाकत लवकरच आम्ही गंगाद्वार जवळील रस्त्याला येऊन पोचलो आणि तिथे अजून एक सवंगडी ( कुत्रा ) मोती आमच्यासोबत जॉईन झाला .येथुनच डाव्या बाजूचा एक आपणास रस्ता ब्रम्हगिरी पर्वतावर घेऊन जातो.साधारण अर्ध्या तासात आम्ही रस्त्यात दगडांच्या पायर्यावरून चढायला सुरवात केली. समोर आणि ऊजवीकडे लांबवर पसरलेला कातळकडे, त्याशेजारील दुसर्या डोंगरांचे कडे जमिनीपासुन आम्हीे ऊंच आल्याची जाणीव करुन देत होते. पहिला टप्पा पार करुन आम्ही मारुतीरायापाशी पोहोचलो.आम्ही आधीच हातात काठ्या आणलेल्या होत्या कारण आमची गाठ मारुतीरायाचे दूत अर्थात माकडाशी पडणार होती. इथली माकडे हि जाणार्या लोकांना जरा जास्तच धमकावत होती किवा सोबत असलेल्या खाण्याचा वस्तू ओढण्याचा प्रयत्नात होती त्यामुळे आम्ही समूहाने वर जात होतो. माकडांच्या समूहातून मार्ग काढत काढत आम्ही ब्रह्मगिरीच्या माथ्यावर पोहोचते झालो. ब्रह्मगिरी मंदिराचे दर्शन झाल्यावर आम्ही जटा मंदिराच्या दिशेने निघालो. तिथे आमचे २ मित्र आम्हाला जॉईन झालेत जे तिथेच त्र्यंबकेश्वर राहत होते आणि दुर्ग भांडार बद्दल त्यांना पूर्ण माहिती होती. जटा मंदिराजवळ मोती आणि दुसरा ग्रुप च्या कुत्र्यामध्ये भांडण झालीत ती दोघ प्राणी अनामिक शक्तीने एकमेकावर हल्ला करत होती . कोणीच माघार घेयीना शेवटी दोघ ग्रुप च्या मुलांनी मद्ष्टी करून भांडण सोडवली. जटा मंदिरा मागून सरळ पुढे २० मिनिटे चालत गेलो की आपण पोहोचतो त्र्यंबक गडावरील अजून एका अद्भुत ठिकाणी. याचे नाव दुर्ग भांडार.

दुर्ग भांडार : काही नवीन ठिकाणांची माहिती मिळाल्यावर तेथे जाईस्तोवर त्या ठिकणाबद्दलची एक अनामिक ओढ मनाला लागून राहाते. असेच काहीसे झाले होते 'दुर्ग भंडार' ह्या किल्ल्याबद्दल. मला दुर्ग भंडार बदल ट्रेकिंग च्या प्लानिंग करतानाच पहिल्यांदा मी ऐकले. ऐकल्यावर आणि तिथली छायाचित्रे (फोटो) विडीओ यु टूब वर पाहिल्यावर इथे केव्हा पोहचू असे झाले होते. येथे जाताना तोल सांभाळूनच जावे कारण वाटेच्या उजवीकडे डोंगरधार तर डावीकडे खोल दरी.दुर्गम असल्यामुळे सहसा दुर्ग भांडारच्या वाटेला फारसे कुणी जात नसावे. येथे माणसे दिसत नसली तरी माकडांचा वावर पुष्कळ आहे .त्यांच्यापासून स्वतःला आणि जवळील वस्तूंना सांभाळूनच राहावे. खोल दरीच्या बाजुबाजूने, वाळलेल्या व अतिशय घसरड्या झालेल्या गवतावरुन जाणारी अरुंद वाट आमचे लक्ष वेधुन घेत होती आम्ही त्या वाटेवरून घाबरत घाबरत कडे कडेने पुढे जात होतो. कडेने पुढे गेल्यावर जेथे वाट संपते तेथे कडा जणू मधोमध उभा चिरला आहे आणि कातळात खोदलेल्या पायऱ्या आम्हाला तळाशी घेयून गेल्या. तळाला खूप अंधार असल्याने भीती हि वाटत होती. इथे हि आमची भेट माकडांच्या टोळीशी झाली पण मोतीने एकही माकडाला आमच्या जवळ येऊ दिले नाही.पायऱ्या संपल्यावर एका अरुंद दरवाजातून सरपटत-सरपटत आम्ही वर जाणार्या पायऱ्याने डोंगर पार केला . पायऱ्या उंच आणि जास्त असल्याने थोडा थकवा जाणवत होता. एवाना भांडण आणि माकडांच्या मागे लागलेला मोती हि शांत झाला होता पण बर्यापैकी भांडणाचे निशाण त्याच्या शरीरावर दिसत होते. पायऱ्या संपताच समोरचे दृश काळजाचे ठोके चुकवणारे होते . दोन डोंगरांना जोडणारी अरुंद खाच किवा पूल अतिशय चित्तथरारक दिसत होता. ती वाट पार करताना असे वाटत होते कि आम्ही एखादी साहसी थ्री डी गमे मध्ये आहोत. त्यानंतर डोंगराच्या अगदी पोटातुन निघणारी वाट पार करून आम्ही शेवटच्या बुरुजावर अर्थात दुर्ग भंडारला पोचलो , येथे पोहोचल्याचा अनुभव फारच छान होता. संपूर्ण ग्रुप ने तिथेच सोबत फोटो काढल्यावर आम्ही आयुष्यातील पहिला साहसी आणि अविस्मरणीय अनुभव घेतला.

हा ट्रेक म्हणजे आमच्यासाठी ऊभ्या डोंगरात खोदलेल्या प्रेक्षणीय पायर्‍या, पूर्वजांनी केलेले अपार परिश्रमाची साक्ष आणि निसर्गाप्रतीची आमची ओढ वाढवायला मदत केली. 

- दिनेश पाटील



" A High Flying Adventure "

पराक्रमाची साक्ष-रामशेज किल्ला imageपराक्रमाची साक्ष-रामशेज किल्ला imageपराक्रमाची साक्ष-रामशेज किल्ला image
साडे पाच वर्षे निकराची झुंज देणारा रामशेज अशा किल्ल्यांची ही भटकंती .........

टी एल पी ट्रेकिंग ग्रुप च्या माध्यमातून आम्ही ब्राह्गिरी आणि दुर्ग भांडार किल्ला सर करून आल्यावर नवीन वर्षाच्या दुसर्या आठवड्यात १५ जानेवारी २०१९ ला अजून एक कुठलाही किल्यावर ट्रेकिंग करायचा बेत आखला. पण त्या दिवशी संक्रात असल्याने येणार्याची संख्या कमी होती आणि घरच्यानाही वेळ देता यावा मानून नाशिक पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या किल्ले रामशेज आम्ही पसंती दिली. सात जण आम्ही सकाळी ६.३० वाजेला नाशिक हून रामशेज ला निघालो.

किल्ले रामशेज : नाशिक-पेठ रस्त्यावर पंचवटीपासून १० किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी त्‍यांच्‍या कारकिर्दीत हा किल्‍ला सतत साडेपाच वर्षे (पासष्‍ट महिने) मोगलांशी झुंजत ठेवला.मराठा साम्राज्यातील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या द-याखो-यात व घनदाट झाडींमध्ये होते. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो. किल्ला खूप उंचीवर नाही. दिसायला तसा छोटेखानी, अगदी एखाद्या टेकाडाएव्हढाच. पण त्याला संरक्षण आहे ते चहुबाजुंनी असलेल्या कातळकड्याचे. हा किल्ला सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे याच भक्कम नैसर्गिक तटबंदीच्या जोरावर आणि यावरच्या मूठभर मावळ्यांच्या मनगटाच्या ताकदीवर हा किल्ला मोगलांच्या राक्षसी सैन्यबळापुढे तब्बल साडेपाच वर्षे झुंजला. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला यायचे, म्हणून या डोंगराला रामशेज म्हटले जाते, अशी अख्यायिका आहे.

किल्ला नाशिक जवळ असल्याने ३० मिनिटात आम्ही किल्याच्या पायथ्याच्या आशेवाडीत गावात पोहोचलो तिथून रामशेजची कातळटोपी लक्ष्य वेधून घेत होती. तिथे कार पार्क करून आम्ही किल्याकडे मार्गस्थ झालो. जानेवारी आणि त्यात सकाळची थंडी मोकळ्या जागेवर बर्यापैकी जाणवत होती.पायवाटेने हळू हळू आम्ही वर चढायला सुरवात केली. पुढे उजवीकडे दरी आणि डावीकडे किल्ला यांमधून अरूंद अशी ती वाट होती.रामशेजचे वैशिष्ट्य असे की, तो कोणत्याही बाजूने सहज चढता येतो अन्‌ तोही अगदी तासाभरात म्हणून भरपूर जण सुुटीच्या दिवशी इथे परिवारासोबत फिरायला येणे पसंत करतात. थोड्याच वेळात पुढे बांधीव पायर्‍या लागल्यात. पायर्‍या चढून जातच आम्ही थेट गडाच्या कातळाला भिडलो. गडाचा मूळ दरवाजा तिथेच कातळात बुजलेल्या अवस्थेत आहे.कातळात एक गुहा खोदलेली दिसते. गुहेत रामाचे मंदिर आहे व शेजारीच पाण्याचे टाके आहे.तिथून अजून काही पायर्‍या चढून गेल्यावर आम्ही गडमाथ्यावर आलो. इथे हवेचा जोर इतका जास्त होता कि चालणेही मुश्कील होत होते. आम्ही गडाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन परत दरवाजापाशी येऊन समोरच्या पठारावर गेलो. इथे बर्‍यापैकी सपाटी असून काही अवशेष, ओहोरलेले पाण्याचे टाके व ध्वजस्तंभ आहे.दोन तासात पूर्ण गडाचा फेरफटका मारून आम्ही उतरणीला लागलो. २० ते २५ मिनिटातच परत पायथ्याला पोहोचलो. सकाळचे ९:३० वाजत आले होते आणि सकाळी नाश्ता केल्या नसल्याने सगळ्यांना भूकही लागली होती म्हणून पंचवटीच्या फेमस अंबिकाची काळी मसाल्याची मिसळ वर ताव मारून आम्ही घरी निघालो.

-दिनेश पाटील




"Where adventure is never scripted"

रोमांचक-हरिहर गड imageरोमांचक-हरिहर गड imageरोमांचक-हरिहर गड image
रोमांचक , साहसी सुबक पाय-यांनी सजलेला हरिहर गडाची भटकंती .......

किल्ले रामशेज वरून भटकंती करून आल्यावर लगेच आम्ही दुसर्या दिवशी पुढील भटकंती ची योजना आखली.. आणि ती होती आपल्या सुबक पायर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या किल्ले हरिहर ची. १९ जानेवारी २०१९ ला सकाळी आम्ही ५ वाजेला आम्ही नाशिक वरून त्र्यंबकेश्वर च्या दिशेने निघालो. तिथून १० किलोमीटर वर हरिहर गड आहे, अंतर जास्त नसल्याने ४५ मिनिटात आम्ही पोहचलो पण वाटेत अंधारात अचानक रस्त्याने सायकलने जाणाऱ्या माणसाला कारचा धक्का आम्ही थोडक्यात वाचवला. थोडक्यात होत्याचे न्हवते झाले असते ह्या विचाराने अंगावर शहरे आले.

हरिहर किल्ला : नाशिक जिल्ह्यातील सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे , त्याचा कातळ कोरीव पाय-यांचा मार्ग, त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारं सारं गिरिप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे १८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात”. खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे..

हरिहर गडावर पहिल्यांदाच जात असल्याने आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचल्यावर तिथून वाट दाखवण्यासाठी एका वाटाड्याला सोबत घेतले. घोटी-मोखाड्याकडे जाणार्या रस्त्याने आम्ही रस्त्यावरच्या निरगुडपाडा या गावात पोचलो , तिथेच झाडाखाली गाडी लायून नि वाटाड्याला सोबत घेत उत्तरेकडे निघालो. गाव सोडलं आणि थोडे पुढे आलो. लगेच उजवीकडे समोर पाहिल्यावर लगेच हरिहर किल्याचं गगनभेदी आकर्षक रुप आमच्या नजरेला खिळवून ठेवतं होते. सकाळची थंडी आजही जाणवत होतीच पण पाऊले आतुर होऊन गडाच्या दिशेने झपझप पडत होती.अर्ध्या तासाच्या सरळ चालीनंतर किल्याच्या पश्चिम डोंगरधारेवर दक्षिण बाजूने पोचलो तिथून घळीसारखा मार्ग व सोबतीला तुरळक झाडांच्या सोबतीने आम्ही वर चढाई करायला सुरवात केली. तासाभराच्या सोप्या चढाईनंतर आम्ही सपाटीवर आलो आणि थोड्याच वेळात वेताळ मंदिराजवळ पोहचलो.येताना जिथे हि छान निसर्ग आणि ठिकाण लागायचे ते लगेच आम्ही सोबत आणलेल्या मोबाईल आणि कॅमेरामध्ये कैद करून घायचो. वेताळ मंदिराजवळ उत्तर बाजूने दुसर्या बाजूचे पायथ्याचे गाव हर्षवाडीकडून येणारी वाटही इथेचं येऊन मिळते. पुढे उंचवट्या सारख्या मातीच्या टेकडीला पार केल्यावर आम्ही थेट हरिहरच्या सुबक पायरी मार्गाच्या अंगाला भिडलो. या कातळपायऱ्याच हरिहरचं खास वैशिष्ट्य आहेत. कितीतरी वेळ सारखं बघतचं रहावं असा वास्तूकलेचा अप्रतिम आविष्कार समोर उभा ठाकलेला असतो. माथ्यावर दोन बुरुजांच्या कवेत उभं ठाकलेलं सुंदर प्रवेशद्वार व त्यावर मोठ्या गर्वाने फडफडणारा भगवा इतिहास वैभवात घेऊन जातो .दगडात सरळ उभ्या कोरलेल्या पायऱ्या बघून तोंडातून आपसूक शब्द निघाला " अप्रतिम "

पायर्यांजवळ आल्यावर उभा वर चढताना मनात धडकी भरत होती. सुदैवाने पायऱ्यावर पकडण्यासाठी खाचे असल्याने थोडी भीती कमी झाली. आम्ही सावध पवित्रा घेत चढाईला सुरवात केली साधारण ऐंशी अंशाच्या कोनामध्ये सरळ रेषेत अगदी आभाळातच घुसलेली ही वाट आपण चढायला सुरुवात करतो, तेव्हा मात्र तिचा खरा अंदाज येतो. एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा पद्धतीची ही रचना केलेली दिसते .२० मिनिटात पायऱ्या चढून आम्ही सुरेख प्रवेशद्वारातून एका टप्प्यावर आलो. प्रवेशदारातून आलेली वाट पाहिली तर असं लक्षात येतं की वर येणं एकवेळ सोपं मात्र उतरणं महाकठीण! समोर उजवीकडे कातळात कोरलेली गणपतीची मूर्ती लक्ष वेधून घेते होती आणि प्रवेशद्वाराला लगतच तटाचं बांधकाम बघतचं रहावं असं होत. पुढे माथ्यावर जाण्याचा मार्ग अचंबित करणारा आहे. छोट्याश्या बोगद्यासारख्या भागातून थोडं वाकून गेल्यानंतर पुन्हा कातळपायऱ्या माथ्याकडे नेतात. हे पाहून त्या काळच्या वास्तूविशारदाचं कौतुक वाटत.या प्रवेशद्वाराच्या पुढेच गडाच्या पोटात खोदलेला रस्ता आहे. याच्याच पुढे वर जाण्यासाठी अप्रतिम असा दगडी बोगदा समोर येतो. खरोखर एकापेक्षा एक सरस सौंदर्याकृती आपल्या समोर पायघड्या टाकून पुढे येत राहतात.( चढत असतांना इथे रात्री थांबलेला ग्रुप मिळाला ज्यांचा रात्रीचा अनुभव त्यांनी आम्हाला सांगितला) त्यामुळे एकाचे कौतुक करायला लागलो की दुसरी रचना समोर! हे वास्तुस्थापत्याचे सौंदर्य तुषार झेलतच गडाच्या माथ्यावर आम्ही कधी आलो ते कळत देखील नाही.

माथ्यावर आल्यावर तिथे एक छोटासा तलाव लागतो आणि बाजूला पाण्याच्या टाक्या. तलावाच्या बाजूलाचं चौथऱ्यावर महादेवाची पिंड व नंदी आहेत. तलावातले पाणी खुपच स्वच्छ आणि पिण्यायोग्य होते. तिथेच आम्ही थोडा आराम करून सोबत आणलेल्या भत्ता , राजगिरा लाडू , लीम्बुपानी पियुन फ्रेश झालो. आमच्या समोरच मुंबई वरून २० ते २५ जणाचा ग्रुप लाकडे जमा करून खिचडी चा बेत करत होता.पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते.किल्ल्यावरील हीच सर्वात उंच जागा , या टेकडीवरुन एक अनोख थ्रिल अनुभवायला मिळाल. बाकी गडाच्या माथ्यावरून दिसणारं त्र्यंबकेश्वर डोंगररांगेचं अफाट चित्र डोळ्यांच पारणं फेडणार होतच.येथे आल्यावर आमची गडफेरी पूर्ण झाली. पायथ्यापासून निघून तीन तास झालेले होते इथून आम्ही परतीचं वाट पकडली. चढाई पेक्षा परतीची वाट भन्नाट थ्रिल आणि साहसिक अनुभव देत होती.असा हा खूप थ्रिल असलेला प्रवास आम्ही ५ तासात पूर्ण करून आम्ही नाशिकला निघालो.

काही काही किल्ल्यांची गोष्टच न्यारी असते. इतरांपेक्षा ते वेगळे का ठरतात याचे उत्तर कदाचित वाचण्यापेक्षा अनुभवण्यानेच जास्त विस्ताराने मिळते. नेहमीच्या सराव झालेल्या गडांच्या यादीतले थोडं वेगळं नाव आणि असंच आड वाटेवरचं स्थान म्हणजे हरिहर! तसं पाहिलं तर हरिहर गडाच्या भटकंतीचं सार येथल्या सुबक पाय-यांत सामावलेलं आहे. राकट अशा डोंगरात असणा-या या पाय-या म्हणजे कणखरतेला चढवलेला सौंदर्याचा साजच जणू..! या पाय-यांवरून चालताना तुमच्या-आमच्यासारखी दुर्गवेडी मंडळी स्वर्गाच्या वाटेशी तुलना करू लागली तर यात आश्चर्य आणि अतिशयोक्ती वाटायला नको.

-दिनेश पाटील 



" Let’s be in life with nature "

भटकंती-पांडवलेणी, नाशिक imageभटकंती-पांडवलेणी, नाशिक imageभटकंती-पांडवलेणी, नाशिक image
भटकंती नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी ची ......

तसे पांडव लेणी पासून माझे घर फक्त ५ किलोमीटर वर आहे. जर सोसायटीच्या गच्चीवर गेलो तरी पांडव लेणी चा पहाड अगदी सहज दिसतो. पांडव लेणी हे पर्यटन स्थळ असल्याने खूप जण इथे परिवार सोबत येताच असतात , याआधीहि मी पांडव लेणी ला ३ ते ४ वेळेस जाऊन आलोय पण लेणी पर्यंतच..... ह्या वेळेस टी एल पी ग्रुप ने बेत आखला कि पांडव लेणी च्या वर पर्वतावर जायचे. आता इतक्या सारे ट्रेक करून आल्यावर आम्हाला वाटले पांडव लेणी ट्रेक साठी काहीच नाही पण तरीही फेबुवारी २०१९ शनिवारी ऑफिस ला सुट्टी असल्याने आम्ही सकाळी ७ वाजेला पांडव लेणी च्या पायथ्याशी पोहोचलो.

पांडव लेणी : नाशिक नवीन बसस्थानकापासुन ५ व महामार्ग बसस्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. ही लेणी मात्र प्राचीन आहेत. सुमारे २५०० वर्षापूर्वींची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २००० वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या, पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा, कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या सर्व लेण्यात आहेत ( या लेणी पाहण्यास फी आकारली जाते ). मूर्त्यांची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे. पांडव लेणी च्या पायथ्याशी भारतीय चित्रपट श्रुष्टीचे जनक श्री दादासाहेब फाळके यांचे स्मारक आहे.तिथून दगडी पायर्यांनी २० मिनिटे चालत गेल्यावर पांडव लेणी ला सुरवात होते . पांडव लेणी पोचल्यावर आम्ही डाव्या हाताने पांडव लेणी च्या माथ्यावर वर चढायला सुरवात गेली. माती दगड याच्यातून वाट काढत २० मिनिटात आम्ही हाश हुष करत माथ्यावर पोचलो . इथून पूर्ण नाशिक, दादासाहेब फाळके स्मारक आणि आजूबाजूचा परिसर खूपच छान दिसत होता. १० मिनिट थांबून आम्ही परत दुसऱ्या मार्गाने खाली उतरलो. खाली उतरल्यावर नाशिक मध्ये प्रसिद्ध अशी मिसळ पाव खाण्यासाठी आम्ही निघालो.

-दिनेश पाटील 


“Where the heart loves, there the legs walk.”

भटकंती ......"सांदण व्हॅली - एक अविस्मरणीय अनुभव"      image
अनुभव ....आशिया खंडातील दुसऱ्या नंबरच्या  दरीतील भटकंतीचा .....

नुकताच मे महिना सुरु झाला आणि सूर्यदेवता जरा जास्तच कृपादृष्टी दाखवत होता.अशा ऊन्हात ट्रेक तर सोड़ाच घराबाहेर पडायची देखील हिम्मत होत नव्हती . पण खरे ट्रेकर्स अशावेळीही सह्यादीचे राकट रूप बघायला बाहेर पडतात. मे च्या १ तारखेलाच टी एल पी ग्रुप च्या व्हाटअप ग्रुप वर आमच्या एका मेंबर ने इथे जाण्याचा बेत करायचा का म्हणून पोस्ट टाकली."सांदण व्हॅली" हे नाव मला पहिल्यांदा टी एल पी ग्रुप च्या व्हाटअप ग्रुप वर कळले तेव्हा लगेच नेहमीसारखेच गूगल चा आधार घेउन माहिती मिळवायला लागलो, जशी जशी माहिती वाचत होतो तसे तसे कुतुहूल वाढत होते आणि थोडं वाईटही वाटत होते कारण निसर्गाच्या कुशीत दडलेलं ‘सांधण दरी’ हे आश्चर्य मला माहीतही नव्हते. ११ आणि १२ मे ला आम्ही तिथे जाण्याचा आणि रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशी परत येण्याचा असा २ दिवसांचा प्लॅन बनवायला सुरवात केली पण काही जणांना जमत नसल्याने आम्ही १८ मे २०१९ ला एका दिवसाचा प्लॅन केला. आता पर्यंत आम्ही फक्त पर्वत किंवा किल्ले यांच्यावर ट्रेक केलेले होते  दरीत ट्रेकिंग करायची पहिलीच वेळ होती म्हणून खूप उत्सुकता होती . सकाळी ४.४५ ला आमची १० जणांची टीम कार ने नासिक-मुंबई महामार्ग वरून एका अनोख्या ट्रेक च्या दिशेने निघालो. अर्ध्या वाटेपर्यंत मित्राने परदेशातून आणलेल्या कॅमेराला सेल्फी स्टिकला ब्लु टूथ ने कसे कनेक्ट करायचे याचा प्रयन्त करण्यात गुंतलेलो होतो.

सांदण व्हॅली : सांदण व्हॅली ही निसर्गाने निर्माण केलेली एक सुंदर दरी आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या ह्या २०० ते ४०० फूट खोल दरीचा आशिया खंडामध्ये दुसरा क्रमांक लागतो. नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात भंडारदऱ्यापासून जवळच सामरद गावापासून ही व्हॅली सुरू होते. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा

६ वाजेला आम्ही भंडारदरा रस्त्याला लागलो आणि सह्याद्री पर्वत रांगेचे दर्शन झाले. पावसाळ्यात नेहमी हिरवेगार असणारे डोंगर उन्हाळ्यात खूपच राकट दिसत होते. ६.२० ला आम्ही रस्त्यावर लागलेल्या बारी गावाजवळ पोचलो . होय तेच बारी गाव जिथून कळसुबाई च्या ट्रेक ने आमच्या टी एल पी ग्रुप ची सुरवात झाली होती. थोड्याच वेळात आम्ही भंडारदरा धरणापाशी असलेल्या शेंडी गावात पोहोचलो तिथे आमच्या एका मित्राने आधीच गाईडची ( सखाराम )व्यवस्था केलेली होती. शेंडीतून सखाराम सोबत घेउन आम्ही त्याच्या जावईच्या घरी आलो तिथेच आमच्या नाश्त्याची सोय केलेली होती. तिथे मस्त सकाळी चुलीवर बनवलेल्या पोह्यावर आम्ही ताव मारला. महाराष्टात पाणी प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव हि तिथे ६० वर्षाच्या आजीला २ ते ३ किमी दुरून प्रवास करून पाणी भरताना बघून झाली. पेटपूजा आणि ग्रुप फोटो काढून आम्ही गाईडच्या मदतीने धरणाच्या पाणलोट क्षेत्राला वळसा घालून घनचक्कराच्या पदरातून रतनवाडीच्या मार्गाने साम्रदला पोहोचतो (अंदाजे २० किमी). हा रस्ता निर्विवादपणे देखणा होता . घनचक्कराच्या कडेने, तलावाच्या बाजूने कधी दाट झाडीतून तर कधी उघड्या आभाळाच्या साक्षीने हा रस्ता चढ उतार घेत वळणे वळणे घेत जातो. त्या रस्त्याने आम्ही साम्रद गावाला पोहोचलो.इथेतर सह्याद्री आपले राकट सौंदर्य दाखवत उभा होता. रतनगड, खुट्टा यांचे एका वेगळ्याच बाजूने अतीशय प्रेक्षणीय दर्शन होत होते. बाजूलाच आजोबाचा महाकाय पर्वत आपल्याला आजोबा का म्हणतात ते दाखवून देत होता. कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगड पाठीमागच्या बाजूने रौद्र दर्शन देत होते. साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे या गावापासून ही व्हॅली सुरू होते . तिथे गाडी लावून आम्ही सखाराम यांस सांदण दरीची वाट दाखवण्यास बरोबर घेतले. १०/१५ मिनिटातच कातळाच्यासड्यावरून आमची वाट दाट झाडीत शिरली. व थोड्याच वेळात आम्ही एका घळीच्या मुखाशी आलो. सांदण दरीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे. इथे आम्ही सुरवात करणार होतो रॅपलिंग ने.सांदण व्हॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे "रॅपलिंग". आम्हीसर्वचजण खूप उत्सुक होतो रॅपलिंगचा अनुभव घेण्यासाठी. आमच्यातले बरेच जण (मी सुद्धा) पहिल्यांदाच रॅपलिंग करणारे होते. तस काहींना थोडा-फार अनुभव होता पण ते पण थोडे घाबरत होतेच.

शेवटी आम्ही तिथे पोहचलो ज्याची सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होते. सांदण व्हॅलीतील "रॅपलिंग" चा. हा पॅच साधारण ४०-५० फुटाचा होता .सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेत, दोरी , हेल्मेट , Locking Carabiner आणि हॅन्ड ग्लोव्हस घालुनच आमच्यातलं प्रत्येकजण हळू हळू सुरक्षित खाली उतरत होते काही सहकारी रॅपलिंग करत असलेल्यांचे आयुष्यातील पहिल्या रॅपलिंग चे विडिओ आणि फोटो काढत होते . रॅपलिंग सुरु करताना भीती वाटत होती पण पूर्ण केल्यावर खूप भारी फीलिंग येत होती . आम्ही एक एक करून २ तासात रॅपलिंगचा थरारक अनुभव घेउन दरीच्या घळीमध्ये उतरलो. घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा लागला जो उन्हाळ्यातही आटलेला नव्हता. इतके स्वछ थंड आणि नितळ होते कि आतले मासे आणि दगडही मोजता येत होती. तो पाण्याचा जारा पार करून सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आम्ही आत दरीच्या नाळेत प्रवेश केला. आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५ ते २० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २ ते ३ फूट अशी ती अतिशय निरुंद नाळ होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती. पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला. साधारण ०.५ फूट खोल १२ ते १३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आणि लाकडाच्या साहाय्याने आम्ही कौशल्याने मार्ग काडून पलीकडे गेलो ( काहींचे जास्तच कौशल्य दाखवण्यात बूट ओले झालेत त्यात मीही होती ) . आता तीव्र उतार सुरु झाला होता. नाळ अधिकाधिक अरूंद होत होती. कुठेही सपाट मार्ग नव्हता. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षर्शः तिथे खच पडला होता. एका ठिकाणी कुणी तरी आपले डोळे ( गॉगल ) दगडावरच विसरून गेलेले होते त्याला हाथ न लावता आमचा नाळेतूनच प्रवास चालला होता. जवळ जवळ १.५ किमी अश्या ह्या अरूंद नाळेच्या टोकाशी पोहोचायला ३० ते ४० मिनिटे लागले . दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नव्हते . आता आम्ही नाळेच्या टोकाशी आलो होतो. आत इथून सह्यादीचे पर्वताचे उग्र दर्शन होते होते. ३५०० फूट सरळ तुटलेले कडे व रतनगडाचा कडा प्रेक्षणीय दिसत होता ( आम्हाला ट्रेकच व्यसन लावणाऱ्यावर सहकारी जास्त रिस्क घेत असताना त्यांची १८ वर्षाच्या मुलीने काळजीने वेळोवेळी " 'पप्पा नको " म्हणून घेतलेली काळजीही कौतुकास्पद होती). ही नाळ पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जावुन मिळते असे गाईड ने आम्हाला सांगितलं. १५ ते २० मिनिटे तिथे थांबून आम्ही तिथले सौंदर्य आणि आम्हाला कॅमेरामध्ये कैद करत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

दरीत जाताना सोपं होत पण येतांना दगड धोंडे चढत येत असल्याने भूकही खूप लागली होती. दरी संपल्यावर टोकावर बसलेल्या २ मुलांकडून आम्ही थोडासा पोटोबा मानून ताजी काकडी आणि करवंद ( डोंगराची काली मैना ) घेउन खात खात आम्ही कार च्या दिशेने निघालो. जेवणाच्या बेत सखारामच्या जावई कडे असल्याने आणि बनवायला वेळ असल्याने आम्ही कारने कोकणकडा कडे निघालो. कोकण कड्यावरून घाटघरचा रौद्र कोकणकडा व पायथ्याचा तलाव व त्यावरील विद्युत प्रकल्पाचे सुंदर दर्शन होत होते. तिथले दृश्य डोळ्यात साठवत आम्ही शेंडी गावात आलो तोपर्यंत जेवणाची सोय झालेलीच होती. मस्त चुलीवर बनवलेले गावरान कोंबडे, भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा ( ठेचा ची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय ) वर मनसोक्त ताव मारला आणि थोडा आराम करून गाईड ने केलेल्या सोयीबद्दल आभार मानून आणि दरीतल्या आठवणी घेऊन आम्ही आमच्या घरट्याकडे ( नाशिक ) परतीला निघालो.

मोठमोठ्या दगडांमधून वाट काढत आणि त्यावरून उड्या मारत पुढे जायचं...पहिली रॅपलिंग चा अनुभव .. सोबतीला उंच, उभाच्या उभा काळाकभिन्न कातळ...डोंगराच्या कुशीत उगम पावणाऱ्या धबधब्याच्या मार्गानं चालायला सुरुवात करून थेट नदीपर्यंत जाण्याचा सांदण व्हॅलीचा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे. .. पण हा ट्रेक आयुष्याच्या कोपरयात कुठेतरी कायमच घर करुन राहील हे मात्र नक्की ......

- दिनेश पाटील 





I BUILT MY SITE FOR FREE USING